विचार, कॉफी आणि समस्या
गेले काही आठवडे घाईगडबडीतच गेले. वेळेचे नियोजन करण्याचे कौशल्य कमी झालेय की काय असे वाटते. वेळेचे नियोजन असो किंवा इतर कोणतेही कौशल्य, वापर कमी झाला की त्याची धार कमी होते. कौशल्य मिळवणे आणि टिकवणे ही एक निरंतर प्रक्रिया आहे आणि सातत्य/चिकाटी हे प्रकार कधीच न जमल्याने, मी प्रक्रियेला नियंत्रित करण्याऐवजी प्रक्रिया मला नियंत्रित करत आली आहे :)
इथे "Great men (great women too) don't beleive in luck, they just beleive in cause and effect!" (महान लोक नशीबापेक्षा कार्यकारणावर विश्वास ठेवतात!) हे वाक्य आठवले. हे "ग्रेट लोक" काय काय करतात हे माहीत असणे आवश्यक आहे त्यामुळे "आपण ग्रेट का नाही?" असा प्रश्न कधी पडत नाही :) थोडक्यात आपण नेहमी जमीनीवर राहतो शिवाय "ग्रेट लोक" जे काही करतात त्याचे थोडेफार अनुकरण केल्यानेही आपल्या बऱ्याचश्या अडचणी दूर होतात.
गेल्या आठवड्यात एकेदिवशी ऑफीसनंतर माझ्या सहकाऱ्याबरोबर कॉफीसाठी गेलो होतो. त्याला बौद्ध/हिंदू धर्म आणि एकूणच तत्त्वज्ञानामध्ये भलताच इंटरेस्ट आहे. त्यामुळे तत्त्वज्ञान आणि ते आताच्या काळात कितपत लागू आहे यावर सुमारे तास दीड तास गहन चर्चा झाली :) या विषयात इंटरेस्ट असणारे आणि ते समजण्याइतपत बौद्धिक क्षमता असणारे कुणी भेटले की मजा येते.
एकंदर विचारप्रवर्तक, आव्हानात्मक थोडक्यात डोक्याला झिणझिण्या आणणारे असे काही ना काही वाचत/करत राहणे आवश्यक असते. महाविद्यालयीन जीवनात विशेषत: अभियांत्रिकीमध्ये (इतर क्षेत्रांचा अनुभव नसल्याने) अशी आव्हाने बरीच असतात. इलेक्ट्रॉनिक्समध्ये तर अश्या गोष्टींचा भरणाच आहे. खरोखर कल्पनाशक्तीला जास्तीतजास्त ताण द्यायचा असेल तर इलेक्ट्रॉनिक्सचा अभ्यास करावा :) पण आता अशी आव्हाने कमी झाल्याने बुद्धीला गंज चढू लागला आहे असे वाटते आहे.
"समस्या काय आहे हे समजणे ही समस्या सोडवण्याची पहिली पायरी असते" त्यामुळे समस्या सोडवण्याच्या एक पायरी जवळ मी आलेलो आहे. आता पुढची पायरी समस्या सोडवणे!
बघू कसे काय जमते.